ईडीने राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर छापेमारी केली. तसेच तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली. यानंतर अनिल परब यांनी माध्यमांसमोर येऊन ईडीच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी त्यांच्यावरील छापेमारी आणि चौकशीची माहिती दिली. साई रिसॉर्ट चालू नसतानाही त्याबाबत तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आल्याचा गंभीर आरोप अनिल परब यांनी यावेळी केलाय.
अनिल परब म्हणाले, “जे रिसॉर्ट सुरूच नाही. याच्याबद्दल प्रदुषण महामंडळाने अहवाल दिलाय. प्रातांनी आणि पोलिसांनी हे रिसॉर्ट चालूच नसल्याचा रिपोर्ट दिला आहे. यानंतरही माझ्या नावाने, साई रिसॉर्टच्या नावाने अशाप्रकारची नोटीस काढण्यात आली. एक तक्रार दाखल करण्यात आली आणि त्याच तक्रारीवरून ईडीने माझ्यावर छापेमारीची कारवाई केली.”
“साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत”
“पर्यावरणाची दोन कलमं लावून या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जातं अशाप्रकारचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्टेशनला नोंद केला. साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्यांनी त्यांचा मालकी हक्का सांगितला आहे. कोर्टात देखील त्यांनी तसा दावा केला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचे सर्व हिशोब दिले आहेत. त्यांच्यावर काही दिवसांवर आयकर खात्याचा छापा मारण्यात आला होता,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
हेही वाचा : ईडी कारवाई करणार हे अगोदरच कसं कळतं? खुद्द किरीट सोमय्या यांनीच दिलं उत्तर; म्हणाले…
अनिल परब यांच्याशी संबंधित ईडीची ६ ठिकाणी छापेमारी
दरम्यान, ईडीने आतापर्यंत अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या अजिंक्यतारा या ठिकाणी छापेमारी केली. याशिवाय वांद्रे पूर्वमधील मोनार्क इमारतीतील खासगी निवासस्थानी देखील ईडीने छापेमारी केली. चेंबुरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरीही ईडीने छापेमारी केली. दापोलीतील साई रिसॉर्ट येथे ईडीने चौथा छापा टाकला. दापोलीतील जमीन विक्रेते विभास साठे यांच्या घरी पाचवा छापा टाकण्यात आला. शिवसेना विभाग संघटक संजय कदम यांच्या घरी सहावा छापा टाकण्यात आला.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/WHLbBUj
via IFTTT