मुख्यमंत्री ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
मुंबई : करोनाशी आपण ज्या जिद्दीने लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले. त्याच ईर्षेने स्वच्छ महाराष्ट्र घडविण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील सर्व सरपंचांना केले. गेल्या दोन वर्षांपासून करोनासह अनेक नैसर्गिक आपत्तींना समर्थपणे तोंड देत आहोत. परंतु अजिबात डगमगू नका, खचून जाऊ नका. सरकार खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी जनतेला दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानअंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ‘सरपंच – पाणी व स्वच्छता संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील २७ हजार ८३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून संवाद साधला.
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना स्वच्छता हेच अमृत हा नवा मंत्र आहे हे ध्यानात ठेवून काम करा. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही. त्यामुळे आपले आयुष्यमान वाढल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून हे अमृत आपण मिळवा. करोना परिस्थिती महाराष्ट्राने उत्तमरीत्या हाताळल्याबद्दल आपल्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. आम्ही दिलेल्या सूचना आपण सगळ्यांनी पाळल्या त्याचेच हे फळ आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले. करोनामुक्तीबरोबरच कचरामुक्त आणि निरोगी गाव अशा मिशनने आपण पुढे गेले पाहिजे. संत गाडगेबाबांनी जो संदेश दिला आहे तो अजूनही कालबाह्य झालेला नाही. त्यांनी आपल्याला काळाच्या पुढे पाहायला शिकवले. ते तेव्हा एकटे होते पण आज आपण सगळे आहात. प्रत्येक सरपंच जर गाडगेबाबा बनले तर गावांचे चित्र बदलेल. त्याच भूमीत आपणसुद्धा जन्माला आलो आहोत. आपल्याला ती शिकवण घेऊन पुढे जायचे आहे. लोकांकडून त्या शिकवणीप्रमाणे करून घ्यायचे आहे. भावी पिढीने सरपंचाची आठवण काढली पाहिजे इतके चांगले काम आपण करून दाखवावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास नाशिक येथून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जलजीवन मिशनचे अभियान संचालक हृषीकेश यशोद उपस्थित होते.
‘हर घर नल, हर घर जल’
‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना सरपंचांनी राबवून ती यशस्वी करणे गरजेचे आहे. विकासाची किरणे तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजेत. आपण सर्व या व्यवस्थेचा पाठकणा आहेत. तुमच्या सूचना, सहभाग हा या योजनेचे यश ठरविणार आहे. गावांत रोजगार निर्माण व्हावा, छोटे-मोठे व्यवसाय सुरू व्हावेत, एक आदर्श गाव निर्माण व्हावे. सरपंच हे एखाद्या झाडाच्या मुळांसारखे असतात. म्हणून हे मूळ भक्कम असण्याची गरज आहे. गावागावातली कामे करताना पर्यावरणाचा विचार करून झाली पाहिजेत. विकासाच्या ध्यासापायी पर्यावरणाची हानी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
The post करोनाशी लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3utJ8Fy
via IFTTT