मुंबई : महाविकास आघाडी सरकार असताना ‘टाटा-एअरबस’चा प्रकल्प महाराष्ट्रात नागपूरमध्ये मिहान येथे उभारण्याचे ठरले होते. मात्र हा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या प्रकल्पांच्या या पळवापळवीबाबत केंद्र सरकारकडे दाद मागण्याचे धाडस राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दाखविणार का, असा सवाल माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. राज्याचे प्रकल्प पळवण्यासाठीच सत्तांतर घडवले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात चर्चा झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टाटा समूहाचे प्रमुख चंद्रशेखरन यांच्यात ‘वर्षां’ या मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक झाली होती. नंतर नागपूर जवळील मिहान येथे हा प्रकल्प उभारण्याबाबत त्यांनी पसंतीही कळवली होती. यांसह आणखी काही प्रकल्पांबद्दल सह्याद्री अतिथीगृहावर पुन्हा बैठक झाली होती, असे देसाई म्हणाले.
विविध सवलती तरीही..
टाटा- एअर बस प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी नागपूर येथील मिहानमध्ये जमीन देऊ करण्यात आली होती. टाटाच्या अधिकाऱ्यांनी मिहान येथे जाऊन जागेची पाहणी केली होती. जमिनीच्या किमतीत २५ टक्के सवलत देण्यात येणार होती आणि भांडवली गुंतवणुकीवर कर सवलत, जीएसटीमध्ये सवलत अशा अनेक कर सवलती देण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
from Mumbai Marathi News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Breaking Headlines & Updates | मुंबई मराठी बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/zlxe2G5
via IFTTT