गणेशोत्सवानिमित्त यंदा कोकणात जाणाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत अधिक असून सुमारे दीड लाखांहून अधिक जण कोकणात रवाना होणार असल्याची माहीती एसटी महामंडळाने दिली. एसटी गाड्यांची मागणी यावेळी वाढली आहे. रविवारी १२४१ हून अधिक गाड्या कोकणासाठी सुटतील.
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती विशेष जादा गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार ९५१ गाड्यांचे गट आरक्षण (ग्रुप बुकिंग) झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २,५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना २५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. २७ ऑगस्टला १७८ गाड्या रवाना झाल्या. तर २८ ऑगस्टला १ हजार २४१ आणि २९ ऑगस्टला १ हजार ४४५ एसटी कोकणसाठी रवाना होतील.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/cpnWU0m
via IFTTT