मुंबई : मुंबईतून हरवलेल्या अथवा अपहरण झालेल्या १८ वर्षांखालील मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आता महाराष्ट्रात ‘मोहीम मुस्कान ११’ राबवत आहेत. ही विशेष मोहीम १ जूनपासून सुरू झाली असून ही मोहीम ३० जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये संशयास्पद लहान बालके आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती देण्याची विनंती नागरिकांना करण्यात आली आहे. तसेच कोणताही संशयित मुलगा अथवा मुलगी फिरताना आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. रेल्वे स्थानके, बस थांबे, रस्त्यावर भीक मागणारी अथवा कचरा गोळा करणारी मुले प्रार्थनास्थळे, रुग्णालये, उपाहारगृह, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी लहान मुले आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
१२ हजारांहून अधिक मुलांचा शोध
यापूर्वी १० वेळा पोलिसांनी ‘मोहीम मुस्कान’ राबवली असून या मोहिमेदरम्यान सुमारे १३ हजार बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येत होता. यापैकी १२ हजार २७८ मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यापैकी सुमारे चार हजार मुलांच्या कुटुंबीयांची माहिती मिळवून मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले होते. यापूर्वी जुलै २०२१ मध्ये ही मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी ३४६ पैकी २९९ बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात यश आले होते. ही मोहीम २०१४ पासून राबविण्यात येत आहे.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/4noku6Y
via IFTTT