मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. असं असताना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची अचानक बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. चहल यांची बदली होणं महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. काही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल सिंह चहल यांची केंद्रात सचिव पदी वर्णी लागली आहे.
याबाबत माहिती देताना इक्बाल सिंह चहल म्हणाले आहेत की, ”मला हे सांगताना आनंद होत आहे की, भारत सरकारने मला केंद्रात सचिव पदाचा दर्जा दिला आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील या पदावर नियुक्ती ही सर्वाधिक अभिमानाची बाब.”
इक्बाल सिंह चहल हे १९८९ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ८ मे २०२० साली त्यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी नगरविकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील काम केलं आहे. ते जलसंपदा विभागाचे सचिव म्हणूनही कार्यरत होते. धारावी झोपडपट्टीच्या विकासात चहल यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
यासोबतच ते औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. याशिवाय त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपद आणि उत्पादन शुल्क आयुक्त म्हणूनही काम केलं आहे. इक्बाल सिंह चहल यांनी करोना संसर्गाच्या काळात मुंबईतील स्थिती अंत्यंत संयमाने हाताळली आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने करोना विषाणूचा सर्वात जास्त धोका या शहराला होता. पण चहल यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेनं उत्कृष्ट काम केलं आहे. धारावी सारख्या झोपडपट्टीत देखील करोना विषाणूचा फैलाव रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आलं आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं देखील घेतली होती.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/NeOplKG
via IFTTT