नगरसेवकांचे लाभ आणि अधिकार संपुष्टात
मुंबई : मुंबई महानगरपालिकेची मुदत येत्या सोमवारी ७ मार्च रोजी संपणार असून अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर न झाल्यामुळे ८ मार्चापासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होणार आहे. त्यामुळे महापौरांना पालिकेची गाडी, बंगला, कर्मचारी, कार्यालय हे सर्व लाभ सोडावे लागणार आहेत. तसेच पालिकेच्या वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षांनाही प्रशासनाकडून उपलब्ध झालेली वाहने पालिकेकडे जमा करावी लागणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ नगरसेवकांची मुदत येत्या ७ मार्च रोजी रात्री १२ वाजता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ८ मार्चपासून त्यांना नगरसेवक म्हणून असलेले सर्व अधिकार व लाभही संपुष्टात येणार आहेत. नियमानुसार महापौरांनाही गाडी व भायखळा येथील बंगला सोडावा लागणार आहे. पालिकेच्या स्थायी, सुधार, बेस्ट, शिक्षण या चार वैधानिक समित्या व आरोग्य, महिला व बाल कल्याण, बाजार व उद्यान, विधी समिती अशा विशेष समित्यांच्या अध्यक्षांना दिल्या गेलेल्या गाडय़ा व कार्यालयेही सोडावी लागणार आहेत.
पालिकेच्या १७ प्रभाग समिती अध्यक्षांनाही वाहन देण्यात येते. त्यांनाही ही वाहने पालिकेकडे जमा करावी लागणार आहेत. बहुतांशी समिती अध्यक्ष पालिकेचे वाहन वापरत नाहीत. ते स्वत:चे वाहन वापरतात. मात्र पालिकेकडून त्यांना त्यासाठी भत्ता दिला जातो. हा भत्ता आता बंद होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पालिकेची निवडणूक अपेक्षित होती. मात्र अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. महापालिकेत २२७ नगरसेवक असून ५ नामनिर्देशित नगरसेवक आहेत.
The post ८ मार्चपासून पालिकेत प्रशासकीय राजवट; नगरसेवकांचे लाभ आणि अधिकार संपुष्टात appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/opbkwjS
via IFTTT