महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना नववर्षाची ही भेट देत शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी केली. या निर्णयामुळे १६ लाख घरांचा मालमत्ता कर माफ होईल.
चारच दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशनात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. या घोषणेच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले. आता कायद्यात सुधारणा करण्याकरिता सरकारला प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला.
पाच वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या वचननाम्यात मुंबईकरांची मालमत्ता करातून सुटका करण्याचे वचन शिवसेनेने दिले होते. त्यानुसार महापालिकेने कर माफीची घोषणा केली होती; पण संपूर्ण मालमत्ता कर माफ झाला नव्हता. मालमत्ता करात विविध प्रकारचे ११ कर वसूल केले जातात. त्यापैकी फक्त सर्वसाधारण कर माफ करण्यात आला होता. परिणामी नागरिकांवर बाकीच्या करांचा बोजा होता.
४६५ कोटींच्या उत्पन्नावर पाणी
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने संपूर्ण कर माफ केला आहे. याचाच अर्थ ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ताधारकांना आता मालमत्ता कर भरावा लागणार नाही. त्यातून महानगरपालिकेला ४६५ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल.
फडणवीस यांचा चिमटा
सन २०१७च्या निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी अखेर २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले, देर आए दुरुस्त आहे असा चिमटा काढीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
मुख्यमंत्री प्रथमच जनतेसमोर
घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरचित्र संवादाच्या माध्यमातून आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
मानेवरील शस्त्रक्रियेनंतर सुमारे महिनभरानंतर लोकांसमोर आलेल्या ठाकरे यांनी प्रारंभीच जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सन २०१७ ला निवडणुकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत, यातील बहुतांश वचने पूर्ण केली असून आणखी एक महत्त्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे. १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना ही अडीअडचणीच्या काळात नेहमी मुंबईकरांच्या मदतीला धावून गेली आहे. पूर्ण करता येणार नाहीत, अशी खोटी वचने द्यायची नाहीत, ही परंपरा आपण पुढे नेत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून मालमत्ता कर माफ करणे हे महत्त्वाचे वचन पूर्ण करत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी या वेळी नाव न घेता भाजपवर टीकास्त्र सोडताना, मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची, आकाशात उड्डाणपूल बांधण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत, मुंबईकरांवरील संकटकाळात ते कुठे आहेत हे शोधावे लागते असा टोला लगावला. मुंबईकरांचा ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून १६ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ठाण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठाणे शहरातही मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव ठाणे महापालिकेने मंजूर करून सरकारकडे पाठविला आहे. ठाणेकरांनाही ही सवलत मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, आता नागपूरमधूनही मालमत्ता करमाफीची मागणी होऊ लागली आहे
The post १६ लाख घरांचा मालमत्ता कर माफ; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Jyn4kt
via IFTTT