महाराष्ट्रात आज (२९ डिसेंबर) नव्याने ३ हजार ९०० नव्या करोना रूग्णांची नोंद झालीय. विशेष म्हणजे यात एकट्या मुंबईत २ हजार ५१० रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई दोन्हींमध्येही सोमवारच्या (२८ डिसेंबर) तुलनेत मोठी वाढ झाली आहे. २८ डिसेंबरला महाराष्ट्रात २ हजार १७२, तर मुंबईत १ हजार ३३३ रूग्ण आढळले होते. याशिवाय मुंबईत एका करोना मृत्यूचीही नोंद झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांची काळजी वाढली आहे.
एकूणच वाढत्या करोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील निर्बंध अजून कडक करण्याचा राजेश टोपेंचा इशारा
दरम्यान, राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढत असून लोकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असं सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केलं आहे. १०० टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“मागील आठ दिवसात पाहिलं तर २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २० हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, आज १३०० केसेस आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२०० केसेस रिपोर्ट होतील. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
“रोज अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जी नोंदवली जात होती ती ४०० ते ६०० असायची. पण आज २००० च्या पुढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील अशी परिस्थिती आहे. मुंबईत रोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहे. त्यातून २२०० पॉझिटिव्ह येत असतील चार टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे जो चांगला नाही. त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे,” असा इशारा राजेश टोपे यांनी दिला.
Covid: डबलिंग रेट वाढल्याने राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती, म्हणाले “गती जर अशीच वाढत गेली तर…”
“दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. जुने सर्व निर्बंध त्यांनी आणले आहेत. मॉल्स, रेस्तराँ, लग्न सर्वांवर निर्बंध लावले आहेत. आपल्याकडे जर आपण सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत करोनाचे नियम कठोरपणे पाळावे लागतील. पण जर आपण नियम पाळणारच नसू तर निर्बंधांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यासंबंधी एकत्रितपणे निर्णय घेईल. मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत टास्क फोर्सची बैठक घेऊन वाढत असलेला पॉझिटिव्हिटी रेट, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासंबंधी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत आज किंवा उद्या बैठक होणार असून निर्बंध अजून वाढवण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी टास्क फोर्सचं मत विचारात घेतलं जाईल”.
तूर्त रात्रीची जमावबंदी; उपाहारगृहे, सभा-समारंभ, विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीवर निर्बंध
“लग्न किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये नियम न पाळता पार पडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाला यावर बंधनं आणावी लागतील,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत. “ओमायक्रॉनचे १६७ रुग्ण असून त्यातील ९१ जण बरे झाले असून डिस्चार्ज मिळाला ही जमेची बाजू आहे. कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पण करोनाचे वेगवेगळे व्हेरियंट जास्त चिंतेता विषय आहे,” असं त्यांनी सांगितलं.
The post राज्याची वाटचाल कडक निर्बंधांच्या दिशेने? २४ तासांत ३९०० नवे रुग्ण; मुंबईची संख्या २५१० वर, ओमायक्रॉनबाधितही वाढले appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3sIOv55
via IFTTT